रविवार, १७ एप्रिल, २०११

सावधान ! उन्हाळी शिबिरे म्हणजे पैसे कमावण्याचा धंदा

सध्या शाळांना सुट्या लागल्याने विविध उन्हाळी शिबिरे आणि छंद वर्गांची धूम सुरू झाली आहे. त्यांतील काही दर्जेदार आणि मोफत अगर अल्प शुल्काची शिबिरे सोडली, तर इतर शिबिरे केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशानेच सुरू झालेली असतात. सभोवतालचे वातावरण आणि स्पर्धा यांमुळे पालकही या प्रकारांना बळी पडतात. सुटीत पाल्याला घरी खेळू देण्यापेक्षा एक-दोन शिबिरांत अडकवून दिले, की पालकांनाही काही तरी वेगळे केल्याचे समाधान वाटते. मात्र, ही शिबिरे खरेच आपल्या पाल्यांसाठी उपयुक्त आहेत का? त्यांचे बरे-वाईट परिणाम काय, याचा विचार केला जात नाही. यातूनच अशा शिबिरांची संख्या आणि त्यांचे शुल्कही वाढतच आहे. केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही अशा शिबिरांचे पेव फुटू लागले आहे. त्यामुळे कोणत्याही शिबिरात मुलांना प्रवेश देण्यापूर्वी पालकांनी चौकशी केलेली बरी, अन्यथा फसवणूक होण्याचीच जास्त शक्‍यता आहे.
पाल्यांना शाळाबाह्य उपक्रमांमध्ये सहभागी करण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. त्यात गैर काही नाही. मात्र, त्याचा अतिरेक होता कामा नये, हीच गोष्ट विसरली जात आहे. मुळात सुटीचा खरा अर्थही विसरला जातो आहे. सुटी म्हणजे मोकळीक. वर्षभर वेळापत्रकाप्रमाणे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून दिलासा मिळावा, काही काळ तरी स्वतःच्या मनाप्रमाणे वागता यावे व यातून त्यांच्यातील कंटाळा जाऊन पुढील वर्षासाठी नवीन उत्साह यावा, हा सुटीमागील हेतू असतो; पण सुटीतील शिबिरांचा वाढता प्रसार मुलांच्या या स्वातंत्र्यावरही गदा आणणारा ठरत आहे. शिवाय, पालकांच्या खिशाला कात्री लावणाराही तो ठरत असून, प्रत्यक्षात त्यातून फारसे काही हाती लागत नाही, असेही दिसते. अनेक पालक असे आहेत, की त्यांनी शाळेप्रमाणेच उन्हाळी वर्गांचेही वेळापत्रक करून मुलांना दिवसभर गुंतवून टाकले आहे. सकाळी गाण्याच्या वर्गापासून सायंकाळच्या क्रीडा शिबिरापर्यंत सर्व छंद वर्ग आणि कथित व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांना जाणारी मुले सुटीतील या शाळेने पिचून जातात.
याचा अर्थ, मुलांना उन्हाळी शिबिरांना घालूच नये, असा मुळीच नाही; पण त्या शिबिरांची गुणवत्ता तपासली जावी. तेथे काय शिकविले जाणार आहे, शिकविणारे तज्ज्ञ आहेत का? त्याचा आपल्या मुलाला काही उपयोग होणार आहे का? त्याचे शुल्क आपल्याला परवडणार आहे का? आणि मुख्य म्हणजे त्या गोष्टी शिबिरात न जाता घरच्या घरी शिकण्यासारख्या नाहीत का, याचा विचार करूनच छंद वर्गांची निवड केली पाहिजे. शेजारची मुले अशा शिबिरांत जातात म्हणून, अगर वर्गातील मुले जातात म्हणून आपल्याही पाल्याला अशा शिबिरांना पाठविणारे पालक अधिक आहेत. कोठे तरी जाहिरात वाचली म्हणून, मित्राकडून त्याच्याबद्दल ऐकले म्हणून आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणेज "आमचाही मुलगा उन्हाळी शिबिराला जातो', अशी प्रतिष्ठा मिरविण्यासाठी मुलांना उन्हाळी शिबिरांना पाठविण्याकडे पालकांचा कल असतो. या वृत्तीचा अशी शिबिरे भरविणारे वापर करून घेतात. मोठी जाहिरातबाजी करून अशी शिबिरे आयोजित केली जातात. अर्थात, हा पैसा पालकांकडूनच वसूल केला जातो.
कमी पैशात अगर अगदी मोफत चांगले प्रशिक्षण देणारी शिबिरेही भरविली जातात, हेही दुर्लक्षून चालणार नाही. पटवर्धन स्मारक समितीतर्फे भरविण्यात येणाऱ्या शिबिराचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. केवळ एकाच क्षेत्रात नव्हे, तर विविध क्षेत्रांची, तेही त्या-त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांमार्फत प्रात्यक्षिकांसह ओळख त्यामध्ये करून दिली जाते. त्यामुळे मुलांना ज्याबद्दल अधिक आवड आहे, ती गोष्ट ती आत्मसात करतात आणि इतरही गोष्टींची कामापुरती ओळख होते. अशा शिबिर संयोजकांची संख्या कमी आहे. यातील उत्पन्न लक्षात घेता, काही शाळा अधिकृतपणे अगर त्यांचे शिक्षक एकत्र येऊन तेही अशी शिबिरे आयोजित करून आपली सुटी "कारणी' लावू लागले आहेत.
वर्षभर शाळेच्या चाकोरीत अडकलेल्या आणि ठराविक अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलांना व्यावहारिक ज्ञान आवश्‍यक असते. त्यासाठी अशा शिबिरांचा काही प्रमाणत उपयोग होतो. मुलांना असे ज्ञान व अनुभव देणे आवश्‍यकही आहे; मात्र त्यासाठी किती मोजावेत? त्या पैशातून खरेच अपेक्षित ज्ञान मिळणार आहे का? इतर माध्यमांतून मुले ते मिळवू शकणार नाहीत का? स्वतःच्या धडपडीतून, अनुभवातून मुले ते शिकू शकणार नाहीत का? त्यासाठी इतर माध्यामांचा वापर करता येईल का? किमान, ज्या शिबिराला आपण मुलांना पाठवत आहोत, त्यांच्या गुणवत्तेचे काय? अशा प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करूनच उन्हाळी शिबिरांचे निवड केली, तर पालकांचा पैसा आणि मुलांचा मोकळा वेळ सत्कारणी लागू शकेल.