शनिवार, २५ मार्च, २०१७

कसा करील शेतकरी संप?

सोशल मीडियात सध्या संप हा विषय चर्चेत आहे. 'सर्वांचे संप करून झाले, आता शेतकऱ्यांचा संप कसा असतो ते पहा...' अशा पोस्ट फिरत आहेत. विशेष म्हणजे काही राजकीय मंडळीही शेतकऱ्यांच्या संपाची भिती घालत आहेत. पण येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खरंच शेतकरी संप करू शकतो का? तर नाही. प्रसिद्धी आणि राजकारणासाठी म्हणून ठीक आहे, प्रत्यक्षात खरा शेतकरी कधीच संप करू शकत नाही. याचे कारण त्याच्या जीवन पद्धतीत दडले आहे. शेतकऱ्यांच्या संपावर बोलणाऱ्यांनी प्रथम हे समाजावून घेतले पाहिजे. सर्व बाजूंनी पिचलेल्या या शेतकऱ्याचा राजकारणासाठी वापर होता कामा नये.
पहाटे उठून स्वतः खाण्याआधी जनावरांना चारा घालणारा शेतकरी संप करील म्हणजे जनावरांना उपाशी ठेवेल का? गायी-म्हशीचे दूध काढण्याचे थांबवून डेअरीला न घालणे म्हणजे लौकिक अर्थाने संप म्हणता येईल. प्रत्यक्षात शेतकरी असे करू शकेल का? याचा त्रास दुधावाचून राहणाऱ्या माणसांपेक्षा दुभत्या जनावरांना होणार नाही का? त्यांना चारा आणि खुराक देण्याचे शेतकरी थांबवू शकेल का? शेतात उभे पीक जळताना पाहून संपावर आहे म्हणून पाणी न सोडण्याचे अघोरी धाडस शेतकरी करू शकेल का? ज्या पेरणीवर पुढच संपूर्ण वर्ष अवलंबून असले, ती पेरणी करण्याचे तो थांबवू शकेल का?
अशी किती तरी उदाहरणे आहेत, ही शेतकऱ्यांची कामे नाहीत, रोजचे जगणे आहे. पाट्या टाकू कर्मचाऱ्यांसारखी त्याची अवस्था नाही. दारातील गाय आणि काळीआई हेच त्याचे दैवत आहे, त्याचे जगणे आहे. कोणाला अद्दल घडविण्यासाठी म्हणून किंवा कोणाच्या राजकारणासाठी त्यांच्याशी प्रातारणा करण्याची चूक खरा शेतकरी कधीच करू शकणार नाही. चित्रपटांत दिसणारा, माध्यमांतून रंगविला जाणारा, राजकारणासाठी वापरला जाणारा, खते-बियाण्यांच्या जाहिरातीत दिसणारा शेतकरी वेगळा आहे. रानात राबणारा, शेतात रमणारा आणि सारं संपले म्हणून प्रसंगी स्वतः संपवून घेणारा शेतकरी वेगळा आहे राजे...! पगारदार, व्यावसायिक, राजकारणी यांच्या संपाशी शेतकऱ्याची तुलना करू नये. एक- दोन दिवसांच्या संपाने यांचे काही बिघडत नाही. संप केला तरी पगार मिळतो, जगण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. हातावरचे पोट असणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात संपाचा विचारही येऊ शकत नाही, त्यामुळे इतरांनी त्याची उठाठेव करण्यात काय अर्थ आहे?

- विजयसिंह होलम

गुरुवार, ९ मार्च, २०१७

रामगोपाल, राज आणि राखी... हे चाललंय काय?

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री राखी सावंत  यांची वक्तव्य सध्या चर्चेत आहेत. त्याहीपेक्षा ती विचार करयाला लावणारी आहेत. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही, मात्र त्यांनी ज्या उदवेगातून ही विधाने केली आहेत, तो विचार करायला लावणारा आहे. ठाकरे यांच्या वक्तव्यातून राजकारणातील तर या दोघांच्या वक्तव्यातून समाजातील विदारक स्थितीचे दर्शन होत आहे. अर्थात अशा परिस्थितीत यावर मात करण्याचा उपाय सूचवायचा की त्या परिस्थितीशी जूळवून घेत या सिस्टीमचाच एक भाग होण्याचा सल्ला द्यायचा हे ठरवायला हवे.
 महिला दिनाच्या शुभेच्छा देताना वर्मा यांनी महिलांना सनी लिओनीसारखे व्हावे असा सल्ला दिला होता. त्यावरून वादंग सुरू झाले. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. या वादात राखी सावंतने उडी घेत वर्मा यांचे जणू समर्थन केले. '२०-२० वर्षांचा संसार करून झाल्यावरही एखाद्या पुरुषाला एखादी हॉट बाई मिळाली तर तो बायकोच्या २० वर्षांच्या सेवेला, प्रेमाला एका रात्रीत विसरतो. तर मग महिलांनी आता सनी लिओनच व्हावे'. असे राखीचे मत आहे. सामाजिक दृष्टया विचार केला तर पुरुषी मानसिकता स्त्रियांकडे कशा नजरेने पाहते, हे अनेकदा स्पष्ट झालेले आहे. खरे तर त्यात बदल करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. मात्र, राखीने जो उदवेग व्यक्त केला, तो पुरुषांना हवे तसे बनण्याचा म्हणजे एकप्रकारे पुरूषी मानसिकतेचे समर्थन करून स्त्रियांना त्याप्रमाणे वागण्याचा सल्लाच दिला आहे. नाइलाज आहे म्हणून असेच वागावे लागेल, अशी अपरिहार्यता यातून दिसते.
राज ठाकरे यांचे राजकारणाबद्दलचे विचारही असेच आहेत. मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते म्हणाले होते, काम करून लोक मते देत नसतील तर आम्हालाही अन्य पक्षांप्रमाणे वेगळे मार्ग स्वीकारावे लागतील. ते स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत, हा शेवटचा पराभव आहे. पुढील निवडणूक आम्ही कशाही पद्धतीने जिंकणारच आहोत... ठाकरे यांचे हे विधानही अशाच नकारात्मक परिस्थितीतून आलेले आहे. आतापर्यंत मनसेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात होते. वेगळे पायंडे पाडणारा, वेगळ्या वाटेने जाणारा पक्ष म्हणून मनसेकडे पाहिले जात होते. अर्थात पक्षाची ही धोरणे प्रत्यक्ष मते मिळविण्यात कमी पडली. म्हणून आपली मूळ वाट सोडून दुसऱ्या कोणाच्या मार्गाचे (की जो मार्ग वाईट आहे, असे आपणच म्हणालो होतो) अनुकरण करणे ही मनोवृत्ती कोणता संदेश देणारी आहे?
यामुळे या दोन्ही विषयांवरील वक्तव्य पराभूत मनोवृत्तीची आहेत. हा पराभव एकट्या त्या वक्तींचा मानायचा की, एकूणच यंत्रणेचा? याचा विचार केला पाहिजे, असे वाटते.

- विजयसिंह होलम

सोमवार, ६ मार्च, २०१७

यांना खरा सैनिक कळलाच नाही....

सैनिकाचे जीवन किती कष्टवत आहे, याची परिपूर्ण जाणीव असूनही हजारो तरूण जिद्दीने सैन्यात भरती होतात. देशाची सेवा करता करता स्वतःचा संसार चालविण्यासाठी त्यांना हा मार्ग निवडलेला असतो. केवळ झपाटलेले, ध्येयवेड तरुणच हा मार्ग स्वीकारू शकतात. उरलेले आमदार-खासदारांच्या मागेपुढे फिरत असतात. तरुणांना लाचार बनविणाऱ्या या राजकारण्यांना सैनिकांची जिगर कशी कळणार?

आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्दल केलेल्या निर्लज्ज विधानाबद्दल त्यांची सर्वत्र छी थू झाली. अर्थात यात सैनिकांबद्दलची आस्था, प्रेम यासोबतच राजकीय कारणही आहे, हे नाकारून चालणार नाही. सध्याचे राजकारण पहता त्यांच्याकडून सैनिकांना न्याय आणि सन्मान मिळेल, याची खात्री देता येत नाही. राजकारणासाठी लाचारांची फौज तयार करणाऱ्या, शेकडो तरुणांना भुलथापा देत आपल्या मागेपुढे फिरायला लावणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना सैनिकांचे खरे जीवन कळणार नाही, त्यांची जिद्द त्यांना कळणार नाही. किमान त्यांचा सन्मान नका करू पण त्यांची निंदा नालस्ती तरी करू नये, एवढीही भान या लोकांना राहिले नाही. एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे हे विधान किती दूरगामी परिणाम करणारे ठरू शकते, याची जाणीव तरी ठेवली पाहिजे.

कोण असतात हे सैनिक? का भरती होतात ते सैन्यात? त्यांना उपजिविकेचा दुसरा मार्ग नसतो का? हे जीवन एवढे कष्टवत आहे याची जाणीव असूनही त्यांचे आई-वडील त्यांना सैन्यात पाठविण्यास का तयार होतात? हातावर जीव घेऊन लढणाऱ्या या सैनिकांशी विवाह करण्यास त्या जिगरबाज तरूणी का तयार होतात? लाडात वाढविलेली आपली लेक सैनिकाच्या घरात देण्यास आई-वडील कसे तयार होतात? या मागे जी काही प्रेरणा आहे, जो काही त्याग आहे तो या शब्दांचे खेळ करून मते मिळविणाऱ्या राजकारण्यांना आणि ऐषोआरामात जीवन घालविणाऱ्यांना कसा कळणार? यांनी कधी सैनिकाच्या घरी जाऊन पाहिले आहे काय? त्यांचा प्रचारासाठी, मतांसाठी उपयोग होत नाही, म्हणून हे तेथे कशाला जातील? त्यांचे कुटुंबीय कसे आहेत, कोणत्या अडचणींना तोंड देत आहेत, हे यांनी कधी पाहिले आहे? जेव्हा युद्ध होते, अतिरेक्यांविरूद्ध कारवाई होते, त्यात आपले सैनिक शहीद किंवा जखमी होतात, तेव्हा आपल्याला त्यांची आठवण होते. त्यांच्याच जीवावर आपण देशात सुरक्षित असल्याचे भावना तयार होते. त्यावेळी जी सैनिकांप्रती प्रेम व्यक्त करण्याची लाट येते, ती सैनिकांना दिलासा देणारी असते.(मुळात सैनिक अशा अपेक्षेने भरती झालेलेच नसतात) तर दुसरीकडे अशी विधाने त्यांचे मनोधैर्य खच्ची करणारे ठरते. आमदार साहेब, तुम्ही केवळ सैनिकांचा अपमान केला नाही, त्यांच्या पत्नींचाही अपमान केला नाही तर भविष्यात सैनिक होऊ पाहणारे तरुण त्यांची पत्नी होऊ पाहणाऱ्या तरुणींच्या मनोधैर्यावर घाला घातला आहे. मागे एकदा गाजलेला नट म्हणाला होता, आम्ही म्हटले का त्यांना सैन्यात भरती व्हा... कसे बोलतात हे लोक? अरे, हे झपाटलेले तरूण हातावर जीव घेऊन लढतात म्हणून आपण या देशात राहू शकतो. त्यांना प्रोत्साहन देण्याचे सोडून त्यांचा अपमान करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची जाणीव तरी यांना आहे का? अशा लोकांना लोकप्रतिनिधी कसे म्हणावे? यांच्या हातात कारभार कसा सोपवावा? आता यांना निलंबित केले काय, बडतर्फ केले काय आणि तुरुंगात डांबले काय जो संदेश जायचा तो गेलाच आहे. जे संशयाचे वातावरण निर्माण व्हायचे ते झालेच आहे. एकट्या आमदाराने नव्हे संपूर्ण देशाने सैनिकांची माफी मागितली तरी याची भरपाई होऊ शकत नाही. अशा वृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत. यासाठी सैनिकांच्या प्रतीक्षा करण्याची गरज नाही, जनतेनेच हे काम केले पाहिजे.
- विजयसिंह होलम

रविवार, ५ मार्च, २०१७

चक्रव्युहात पोलिस?

पैशासाठी 'चांगल्या' ठिकाणी बदली आणि बदलीसाठी पैसा, असे दुष्टच्रक पोलिस आणि राजकारण्यांनी मिळून तयार केले. यासाठी पोलिसांना अनेक खटपटी करणे भाग पडले. त्यातूनच गुन्हेगारांशी संबंध ठेवणे, वेळप्रसंगी त्यांना पाठीशी घालणे, राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनणे अशा गोष्टी पोलिसांकडून होत गेल्या. या गडबडीत सामान्य माणूस पोलिसांपासून दुरावला. यात सर्वाधिक टीकेची झोड पोलिसांवर उठते. खरे तर बहुतांश पोलिसांनाही आता यातून बाहेर पडायचे आहे, पण त्यांना हा चक्रव्यूह भेदता येत नाही.

नगर तालुक्यातील पांगरमल येथे बनावट दारूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. ही बनावट दारू सिव्हिल हॉस्पिटलच्या कँटीनमध्ये तयार होत असल्याचे आढळून आले. याला जबाबदार धरत काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. त्यानंतर आता दहा पोलिसांवरही कारवाई झाली. सिव्हिल हॉस्पिटलमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. यातून सर्वांत गंभीर बाब पुढे आली, ती म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गुन्ह्यातील आरोपींशी पोलिसांचे संबंध होते. याचा वापर करून त्यांनी बिनधास्तपणे गुन्हा केला. पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असण्याची ही एकमेव घटना नाही. अशी चर्चा अनेकदा सुरू असते. मात्र, या कारवाईतून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुन्हेगारांशी थेट संबंध ठेवणे आणि मिळणाऱ्या फायद्यामुळे त्यांच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणे हे दोन्ही प्रकार तेवढेच गंभीर आहेत. नगरमधील या घटनेमुळे पोलिस आणि गुन्हेगार यांच्यातील संबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत.
वास्तविक पहाता पोलिस ही शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत बांधलेली व्यवस्था आहे. त्यांच्यासाठी पोलिस मॅन्यूअल नावाची लिखित आचासंहिता उपलब्ध आहे. त्यामध्ये पोलिसांचे अधिकार, कर्तव्य, वर्तन अशा अनेक गोष्टींबद्दल सांगितले आहे. जणू पोलिसांचा तो धर्मग्रंथच आहे. अशा चौकटीत बांधण्यात आलेली ही यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून चौकट मोडून वागू लागली आहे. केवळ नगरच नव्हे, सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. पोलिसांनी निष्पक्ष असावे, सामान्यांना दिलासा आणि गुंडांना जरब बसेल असे काम पोलिसांकडून अपेक्षित आहे. मात्र, मधल्या काळात या यंत्रणेचा राजकारणासाठी वापर करण्याचे प्रकार सुरू झाले. तेव्हापासून वरपासून खालपर्यंत या यंत्रणेला वाळवी लागली. ती कीड आता एवढी पसरली आहे, की त्यातून कोणीच सुटू शकत नाही. जुन्यांना या किडीने पछाडले आहेच, पण नव्याने पोलिस दलात येणाऱ्यांनाही या यंत्रणेचा एक भाग बनून रहावे लागत आहे. या पोखरलेल्या यंत्रणेवर सामान्य माणसाचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. या यंत्रणेने सामान्य माणसाची साथ सोडली. राजकारणी आणि गुन्हेगारांमध्ये त्यांची उठबस वाढली. त्यांच्याच इशाऱ्यावर त्यांचे काम चालू लागले. पोलिस ठाण्यात सामान्यांपेक्षा राजकारणी आणि गुन्हेगारांना सन्मानाची वागणूक मिळू लागली. त्यामुळे पोलिस आणि सामान्यांतील दरी वाढत गेली. पोलिसांचे कॉल डिटेल्स तपासले असता त्यात गुन्हेगारांशी सतत संपर्क झाल्याचे उघडकीस आले, म्हणून या प्रकरणात नगरच्या काही पोलिसांवर कारवाई झाली. पोलिसांच्या संपर्काचा विचार करायचा झाल्यास, किती पोलिस सामान्यांच्या संपर्कात असतात, हाही प्रश्नच आहे. पोलिस महासंचालकांनी आखलेल्या एका योजनेतून सोशल मीडियाचा वापर करीत आपल्या भागातील सामान्य आणि सन्माननीय नागरिकांशी संपर्कात राहण्यास पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांचे मोबाइल तपासले तर बहुतांश पोलिसांकडे आपल्या भागातील अशा व्यक्तींचे नंबरसुद्धा आढळणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. गुन्हेगार आणि राजकारण्यांशी संपर्कात राहणारे पोलिस सामान्यांना का टाळतात? स्वतः होऊन त्यांच्याकडे जाणे दूरच, पण पोलिस ठाण्यात आल्यावरही त्यांची कामे सहजासहजी केली जात नाहीत. पासपोर्ट व्हेरिफिकेशेन, नोकरीसाठी चारित्र्याचा दाखला, वस्तू हरवल्याची तक्रार फार तर चोरीची किंवा अन्य गुन्ह्याची तक्रार अशी साधीसाधी कामे घेऊन येणाऱ्या सामान्यांनाही पोलिसांचा वाईट अनुभव येतो. यासाठीही एखादा पुढारी, नगरसेवक किंवा दादाची शिफारश आणावी लागते. त्यामुळे सामान्यांना पोलिस कधीच आपले वाटत नाहीत. जेव्हा साक्ष देणे, पंच होणे अशी गरज पोलिसांना पडते, तेव्हाही कोणी सामान्य तयार होत नाहीत. शेवटी पोलिसांना आपल्याच नित्य संपर्कातील छोट्या मोठ्या गुन्हेगाराला किंवा अड्ड्यावाल्याला यासाठी बोलावून आणावे लागते. पोलिसांमधील हरवलेली संवेदनशीलता हेही एक याचे कारण असते. गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्ह्यांतही पोलिसांची भूमिका यंत्रवत असते. या गोष्टींचा सामान्यांच्या मनात राग असतो.
पोलिस दलाची ही अवस्था होण्यासाठी स्वतः पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत. जेव्हापासून पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप सुरू झाला, तेव्हापासून या प्रकारांना बळ मिळत गेले. पैशाशिवाय पोलिसांचीच कामे होत नाहीत, असे दिसून आल्यावर त्यांनीही अंतिम ध्येय पैसा मिळविणे हेच ठरविले आणि पोलिसांच्या कामाची पद्धतच बदलून गेली. चांगल्या ठिकाणी बदली हवी असेल तर पैसे मोजावे लागतात म्हणून ते मिळविण्याचे विविध मार्ग त्यांनी शोधले. त्यासाठी गुन्हेगारांना पाठीशी घालण्यास सुरवात झाली. पोलिसांकडील हा पैसा जसा राजकारण्यांनी ओळखला तसाच विविध संघटना आणि उपद्रवी मंडळींनीही हेरला. त्यामुळे त्यांच्याकडूनही पोलिसांकडे तगादा सुरू झाला. त्यासाठी पोलिसांविरूद्ध तक्रार करणे, लटकी आंदोलने करणे, खोट्या गुन्ह्यांत अडकविणे, विविध आयोगांच्या चौकशा मागे लावणे, बदल्या घडवून आणणे असे प्रकार सुरू झाले. हे टाळण्यासाठी पोलिसांनीही सरळ अशा उपद्रवींशीही हातमिळवणी केली. वाटेकरी वाढल्याने कमाईचे मार्गही वाढविण्यात येऊ लागले. एकूणच ही यंत्रणा न्याय मिळवून देण्यापेक्षा पैसे मिळविणारी झाली की काय, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती बिघडत गेली. पोलिसांची ही कार्यपद्धती त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक घटकाला माहिती होत गेली. त्याचा गैरफायदाच अनेकांनी घेतला. आधीच बदनाम असलेली ही मंडळी पोलिसांच्या सहवासात आली, त्याने बदनामी पोलिसांचीच झाली. या गडबडीत पोलिसांची अंतर्गत शिस्तीची चौकटही मोडून गेली. सामान्य पोलिस कर्मचारी थेट पोलिस अधीक्षक आणि त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आव्हान देऊ लागला. मॅट, कोर्ट, विविध आयोग, मीडिया या सर्वांचा यथायोग्य वापर यासाठी केला जाऊ लागला. एकमेकांना टार्गेट करण्यासाठी पोलिसांतील अंतर्गत, गोपनीय माहितीही बाहेर येऊ लागली. माहितीचा अधिकार कायद्याचा एकमेकांविरूद्धच वापर केला जाऊ लागला. एकूणच पोलिसांची अवस्था अशी झाली की, रोजच्या प्रमुख कामापेक्षा अशी वाढीव कामे आणि प्रकरणे निपटण्यातच त्यांचा जास्त वेळ जाऊ लागला. कितीही उपक्रम आणि अभियान राबविले तरी पोलिस-जनता संबंध सुधारण्यास मदत होत नाही, याचे प्रमुख कारण हेच आहे.

यातून बाहेर पडण्याची अनेक पोलिसांची इच्छा आहे. वाईटवृत्तीच्या पोलिसांसोबत चांगल्या पोलिसांचीही गणती वाईटांतच होत आहे. पण सध्या परिस्थिती अशी झाली आहे की, यातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. स्वतःचा फायदा होतोय म्हणून पोलिसांनी मधल्या काळात ज्या काही चुका केल्या, त्यांचा आता चक्रव्यूह बनला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग एकट्यादुकट्याचा नाही. संपूर्ण यंत्रणेचे शुद्धीकरण झाल्याशिवाय हा चक्रव्यूह भेदता येणार नाही. मुख्य म्हणजे याचा संबंध आता एकट्या पोलिस दलाशी राहिलेला नाही. अन्य घटकांचाही यात नको एवढा सहभाग झालेला आहे. या सर्वांचे पाश तोडावे लागतील. त्यासाठी पोलिस दलाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. गृहमंत्रीच नव्हे, तर संपूर्ण सरकारचीच अशी इच्छा हवी आणि सक्रिय पाठींबा हवा आहे. सकारात्मक बदल दिसले तर जनता पाठीशी उभी राहील. हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नसला तरी अशक्यही नाही. मनापासून राबविलेले एखादे स्वच्छता अभियान नक्कीच यशस्वी होऊ शकेल. यासाठी पोलिस आणि विशेषतः जनतेचा विश्वास असलेल्या नेतृत्वाने पुढाकार घेण्याची गरज आहे, अशा नेत्याचा हस्तक्षेप नक्कीच स्वीकारार्ह राहील. (रविवार महाराष्ट्र टाइम्स ५ मार्च २०१७)

- विजयसिंह होलम
Vijaysinh.Holam@timesgroup.com